आयुष्य खूप गेले, आता जगेन म्हणतो
आडून आसवांच्या थोडा हसेन म्हणतो
शर काळजातला हा मी काढणार नाही
जे जे दिलेस तू ते सारे जपेन म्हणतो
सारेच श्वास नाही मी उधळले जगी या
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो
न्यायालयी कसा मी निर्दोष आज सुटलो?
आता नवे पुरावे गोळा करेन म्हणतो
रस्तेच वाट चुकले, ना दोष पावलांचा
गावात याच परक्या आता वसेन म्हणतो
ती आमिषे जगाची नव्हती कधीच खोटी
खोटे तुझे इशारे पण मी फसेन म्हणतो
माझ्याच काळजाचा आता लिलाव आहे
बोली तुझी कितीची तेही बघेन म्हणतो
---------------------------------------------------
जयन्ता५२
(इतरत्र प्रकाशित)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा