कृष्णवाणीला जराही राहिलेला त्राण नाही...
...राहिलेला अर्जुनाचाही स्वयंभू बाण नाही
बोथटांचे हे प्रशासन चाललेले छानपैकी..
चेहर्यावरती कुणाच्या कोणताही ताण नाही
पारितोषिक प्राप्त झाले.. सर्व काही स्वच्छ झाले..
कागदोपत्री जराही गाव आमुचे घाण नाही
नोकरीचे काम आहे...टाक पाटी...घाल पाठी...
जीव ओतायास काही हे सतीचे वाण नाही...!
मत्त आणिक मट्ठ लोकांचीच सत्ता सर्व जागी..
कोणत्या खुर्चीत त्यांनी मांडलेले ठाण नाही...?
धुंद तंद्रीतून जागी होत नाही रोषणाई
वेदनेच्या अंधकाराची कुणाला जाण नाही
शुष्क भोगांचीच येथे फक्त जगते प्रेरणाही,
जीवनाची ही कहाणी....जीव आहे.., प्राण नाही..
(संविधानावर कुणाचा राहिला विश्वास आता..?
शासनाचा भास आहे,..श्वास आहे,..प्राण नाही..)
- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा