जेव्हा नव्या ऋतूंनी बोलावले मला
माझ्याच सावल्यांनी वेडावले मला
जेव्हा दिल्या फुलांनी जखमा अजाणता,
हलकेच वेदनांनी जोजावले मला
घरट्यात ऊब, दाणा चोचीत घातला
फुटताच पंख त्यांनी धुडकावले मला
मी का, कसे, कधी अन् कोठून जायचे,
ते मार्ग प्राक्तनाने समजावले मला
आताच वादळांशी झुंजून थांबले
वाऱ्यावरी पुन्हा का भिरकावले मला?
कित्येकदा सुखाच्या मागून धावले,
प्रत्येकदा सुखाने हुलकावले मला
मी संभ्रमात अजुनी शोधीत उत्तरे,
आयुष्य हे कसे अन् का भावले मला?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा