ह्या कशा उबदार ओळी...

वैभव जोशी - ⏱ १ मिनिट
ह्या कशा उबदार ओळी , शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

"मोगरा,जाई,जुई,चाफ्याविना कविता कशी?"
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

हुडहुडी भरली मनाला , आसवेही तापली
काय माझे विकतचे दुखणेच ठसठसले पुन्हा?

कागदांवर मावली नाहीच का नियमावली?
कायदे धाब्यावरी जाऊनही बसले पुन्हा !

एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले
"काय आम्ही वारलो का?" देव खेकसले पुन्हा

ही गज़ल लिहिताच आला सर्रर्रकन काटा जुना
मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा

"आयला ! असला कवी नाहीच झालेला !" म्हणे
आज केले माफ ! पण बोलू नका असले पुन्हा

गझल