प्रश्न

शैलेश कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

-गझल-


माणसे नसतात जेव्हा , भावना असतात का रे ?
सावल्या घनदाट अंधारातही दिसतात का रे ?


करपल्या शेतात विहीरी कोरड्या पडल्या तरिही,
संयमाने ते जमीनी आमुच्या कसतात का रे ?


जीवघेणे दु:ख काही जाहले दिसते तयांना ,
आज वेड्यासारखे ,ते  सारखे हसतात का रे ?


तोच मासेमार आणि ओळखीचे तेच जाळे ,
जाणता परिणाम, मासे नेमके फसतात का रे ?


पाठ जुळलेल्या जुळ्यांच्यासारखे जन्मास येता ,
सॉख्य आणि दु:ख इतके वेगळे दिसतात का रे ?


-शॅलेश. 

गझल