गालिब बेनकाब

बेफिकीर - ⏱ ३ मिनिटे

पुछते है वे कि गालिब कौन है
कोइ बतलाये कि हम बतलाये क्या

सिमला येथे ४ मार्चला बाजारात शायरीची पाच, सात पुस्तके मिळू शकली. त्यात एक आहे हंसराज रहबर यांचे 'गालिब बेनकाब'!

पुस्तक अगदीच पटणार नाही असे नाही. अर्थात, ते पटले काय अन नाही पटले काय, गालिबना जगाने डोक्यावर घेतलेले आहेच. पण शायरी-निर्मीतीमागच्या पार्श्वभूमीबाबत असा दृष्टीकोनही एक भिन्न विचार करायला लावतोच. तसेच, हे पुस्तक बाजारात असल्याने गालिब यांची शायरी कमी मानली जाईल असेही नाही. पण मुद्दे पहा:

महत्वाचे मुद्दे:

१. गालिब यांना भारत या देशाबद्दल काहीही आस्था नव्हतीही अन असण्याचे कारणही नव्हते. (अर्थात, हा काही गुन्हा होऊ शकत नाही, पण इंग्रजांच्या बाजूने लिहिणे हा देशद्रोह मानायला वाव आहे.)

चीन-ओ-अरब हमारा, हिन्दोस्ता हमारा
मुस्लिम है हम वतन है सारा जहाँ हमारा

('दुसरे गालिब' समजले जाणारे डॉ. सर महंमद इक्बाल त्यांच्या तराना-ए-मिल्ली मधे)

२. जुनी रद्द झालेली पेन्शन पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्या खात्यातील सर्व इंग्रज अधिकार्‍यांवर व व्हिक्टोरियावर एक मोठ्ठाच्या मोठा असे अनेक कसीदे गालिब यांनी वारंवार रचलेले होते. आता हे गालिब यांचे शेर पहा:

आगही दामेशुनीदन जिस कदर चाहे बिछा
मुद्दआ अन्का है अपने आलमे तकरीर का

न सताइश की तमन्ना न सिला की परवा
गर नही है मिरे अशआरमे मानी न सही

(हे ते बहुधा त्याच्या मुशायर्‍यातील शायरीवर म्हणत असावेत. कसीद्यांवर नव्हे :-)) )

३. कलकत्याला मिर्जा कतील यांच्याबाबत जाहीर अनुद्गार काढल्याने मार खायची वेळ आली. लिखित माफी मागीतल्यावर सोडले.

कलकत्तेका जो जिक्र किया तुमने हमनशी
इक तीर मेरे सीनेमे मारा कि हाय हाय

४. गालिब पेन्शनसाठी कलकत्याच्या गव्हर्नरकडे मागणी नेऊन तेथेच वास्तव्य करताना राममोहन रॉय कलकत्याला आले होते. रॉय यांना गालिब भेटले नाहीत कारण त्यांच्याकडून पेन्शनचे काम होण्याची काहीच शक्यता नव्हती. उलट इंग्रजांबद्दल स्तुतीसुमने उधळण्यावरून बोलणी खायची वेळ आली असती. कलकत्यात कायम व मुद्दाम इराणी वेशभुषेतच राहिले.

५. स्वतःच्या घरात जुगार खेळताना पकडले गेले अन कैद व दंड झाला. सम्राट बहादुरशहा जफर यांचा हस्तक्षेपही अटक रद्द करण्यास अपुरा पडला.

जिंदगी अपनी जो इस शक्लसे गुजरी गालिब
हम भी क्या याद करेंगे कि खुदा रखते थे

६. कॉस्टेलन किंवा ओल्ड रमचीच सवय असल्याने व देशीने त्रास होत असल्याने प्रचंड उधारी झाली. ओल्डरम व कॉस्टेलनच्या किंमती तिप्पट वाढल्या आणि यांचे उत्पन्न (घरात जुगार खेळायची परवानगी देण्याबद्दलची बिदागी व जुगारात अधे मधे जिंकलेले पैसे सोडून) शुन्य!

कर्जकी पीते थे मय लेकीन कहते थे कि हाँ
रंग लायेगी हमारी फाकामस्ती एक दिन

७. गालिब यांची शायरी 'बेदिल' व 'मीर' यांनी प्रभावित होती असे नसून मीर यांचे शेर त्यांनी चक्क चाळीस वर्षांनी वेगळ्या 'अंदाजे बयाँ'ने पेश केले असे लिहिले आहे.

मीर : बेखुदी लेगयी कहॉं हमको
देरसे इंतजार है अपना
गालिब - हम वहाँ है जहांसे हमकोभी
कुछ हमारी खबर नही आती

है औरभी दुनियामे सुखनवर बहुत अच्छे
कहते है की गालिबका है अंदाजे बयाँ और

वर दिलेल्या एकंदर शेरांपैकी दोन सोडून बाकी सर्व शेर लेखकाने स्वतःच पुस्तकात दिलेले आहेत.

एकंदर, गझलकाराचे मूळ अन गझलेचे कूळ शोधू नये असे म्हणावे की काय असे वाटते. :-)

व्यक्तीशः मला इतर लाखोंप्रमाणेच मीर व गालिब आवडतात. आणखीन एक पुस्तक फिराकचे मिळाले व प्रयत्नपुर्वक वाचले तेव्हापासून फिराकही जास्तच आवडायला लागले आहेत. \

भगतसिंह विचारमंच तर्फे आलेले साक्षी प्रकाशनचे हे पुस्तक १९६९ सालापासून सतत प्रकाशित होत असून सध्या मूल्य रु. ७५ आहे. मुखपृष्ठावर गालिब यांच्या चेहर्‍याचा नुसताच प्रोफाईल व मळपृष्ठावर हंसराज रहबर यांचे छायाचित्र व त्यांची माहिती आहे. लेखकाने 'कलकत्ता सफर' या लेखाचा अंत गालिब यांच्याच मक्त्याने केला आहे.

काबा किस मुंहसे जाओगे गालिब
शर्म तुमको मगर नही आती

'बेफिकीर'!

-सध्या 'मनाली' येथे:-))